मुंबई : टोल दरात वाढ करण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत आजपासून टोलचे दर वाढले आहेत. आधीच महागाई आणि कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना वाढलेल्या टोल दरांचा सामना करावा लागणार आहे. आजपासून टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ झाली आहे. याविरोधात मनसेने आंदोलन केले. काही वाहनांना पैसे देऊ नये, असे सांगत गाड्या टोलनाक्यावरुन मार्गस्थ केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसेने टोल नाक्यावर आंदोलन केले. नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी मनसेनं केली आहे. टोल मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे मनसेकडून सांगण्यात आले.



मुंबई एंट्री पॉइंट्सवर टोल दरवाढ आजपासून लागू होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे लोकल बंद अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यात झालेली ही दरवाढ सरकारने मागे घ्यावी म्हणून आज ऐरोली टोल नाक्यावर मनसेने आंदोलन करत वाहने मोफत सोडली. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला करत टोल नाका पुन्हा सुरु केला. यावेळी आज सौम्य आंदोलन करत असून भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला आहे.