Maratha Reservation : फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे  मनोज जरांगेनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही देसाईंनी म्हंटलय. तर दुसरीकडे मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेल, टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी संयम धरायला हवा असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंना राजकीय प्यादं म्हणून बघतायत अशी टीका संजय राऊतांनी केलीय.. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तेव्हा राज्य सरकारने जरांगेंसोबत तातडीने सकारात्मक चर्चा करावी आणि ती निर्णयापर्यंत पोहोचवावी अशी मागणी राऊतांनी केली.


मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी 24 तास कॉल सेंटर


मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी येत्या 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू होणाराय. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा आणि बिगर मराठा खुला प्रवर्ग असं हे सर्वेक्षण केलं जाणाराय.  राज्यातील अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणाराय. या सर्वेक्षणासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू ठेवा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज दिल्या.. वर्षा निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षणविषयक बैठकीत त्यांनी राज्यभरातील सरकारी यंत्रणेला हे आदेश दिले.


मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा मुंबईकडे रवाना


मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा जालन्याच्या शहागडवरून बीडच्या गेवराई मार्गे मुंबईकडे रवाना झाला आहे. यावेळी संभाजीनगरवरून सोलापूर कडे येणारी सर्व मोठी वाहनं अडवण्यात आली. त्यामुळे गेवराई हायवेचा मुख्य चौक संपूर्ण मोकळा केलाय. 


जरांगेंच्या मोर्चाचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यात


आंतरवाली सराटीतून निघालेला जरांगेंच्या मोर्चाचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील मातोरीमध्ये होणार आहे. मातोरी हे जरांगेंचं जन्मगाव आहे.  याठिकाणी 100 एकरावर जरांगेची सभा होणार आहे.. मराठा आंदोलकांच्या जेवणाची इथं खास सोय करण्यात आलीये. त्यासाठी 4 टन वांगे-बटाट्याची भाजी तयार करण्यात आलीये.. मराठा आंदोलकांसाठी 20हजार स्वयंसेवक इथं सज्ज आहेत.


मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई 


जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेत. मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच नोंदी असूनही आरक्षण न देणारं सरकार निर्दयी असल्याची टीकाही जरांगेनी केली. मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंनी आरपारची लढाई करण्याचा निर्धार बोलून दाखवलाय. अंतरवाली सराटीत मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे पाटील भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. सरकारच्या दारात मरण आलं तरी चालेल असा इशारा देतानाच जरांगे भावूक झाले.. कुणबी नोंदी मिळूनही सरकार निर्दयी कसं असू शकतं असा संतप्त सवालही जरांगेंनी केलाय.