मुंबई: भाजपने जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) फसवल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला. ते सोमवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, हे उद्धव ठाकरे यांचे विधान तंतोतंत खरे आहे. भाजपने मला फसवलं, माझ्या पक्षालाही धोका दिला, असे जानकर यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला १२४ तर भाजपला १५० जागा मिळाल्या आहेत. तर मित्रपक्षांना अवघ्या १४ जागा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने या जागा आपल्या कोट्यातून दिल्याने मित्रपक्षांना भाजपच्याच चिन्हावर लढण्याची सक्ती केली आहे. जिंतूर आणि दौंड या जागांवर भाजपने परस्पर रासपच्या राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांना एबी फॉर्म दिले होते. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले. 


भाजप आणि आमच्यात जागावाटपाची बोलणी झाली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पण, भाजपने रासपला सरळसरळ फसवले आहे. माझ्या पक्षाला धोका दिला. शिवसेनाही जात्यात आहे, मी पण भरडला जातोय, अशी खंत जानकरांनी व्यक्त केली. 


नाशिकमध्ये 'कोथरूड पॅटर्न'; बाळासाहेब सानपांना विरोधकांचा पाठिंबा


केवळ गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेना-भाजपाकडे उमेदवार मागे घेण्याची विनंती करू. तसेच अन्याय झाला असला तरी उपेक्षित समाजाच्या भल्यासाठी रासप महायुतीबरोबर राहणार असल्याचे जानकरांनी सांगितले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजपला या नाराजीचा फटका बसणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.


अर्ज वापसीला सुरुवात; बंडोबांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न