मुंबई : काही प्रमाणात दांडी मारत का असेना पण, यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. अगदी परतीच्या पावसानेही आपली कामगिरी उल्लेखनीय केली. सध्याही राज्यात पावसाचे वातावरण असून, आजपासून पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची दमदार हजेरी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या आधीही हवामान खात्याने असाच इशारा देताना ५ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने येत्या ४ दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसू शकतो असे म्हटले आहे.


दरम्यान, अलिकडील काळात हवामान खात्याच्या कामात प्रचंड सुधारणा झाली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाजही बऱ्यापैकी खरे ठरताना दिसत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेले दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. पावसाची ही बरसात पुढील काही दिवस अशीच सुरू राहील असा हवामान खात्याचा व्होरा आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या विभागाने म्हटले आहे.


दरम्यान, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे त्याचा शेतीसाठी फायदाच होणार आहे. कारण अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाने पाठच फिरवल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील धरणे ओसंडून वाहात आहेत. काही वाहन्याच्या मार्गावर आहेत. तर, दुसऱ्या बाजूला पावासाचा कहर पहायला मिळत आहे. अनेक ठिकामी वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर, काही ठिकाणी इमारती कोसळणे, इमारतींचे छप्पर उडणे, झाडे उन्मळणे असे प्रकार घडले आहेत. या पावसाचा मुक्या जनावरांनाही त्रास झाला आहे. तर, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.