मुंबई : राज्य सरकारने दिलेली विधान परिषद आमदारकीसाठीची 12 नावं मंजूर करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadhi Government) वतीनं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळानं आज संध्याकाळी राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीत 12 नावं मंजूर करण्याचं निवेदन राज्यपालांना देण्यात आलं. महाविकास आघाडीचे नेते याबाबत आपल्याकडे विचारणाच करत नसल्याचं वक्तव्य राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेण्याचं ठरलं. त्यानुसार हे नेते आज राज्यपालांना भेटले. या भेटीनंतर राज्यपाल लवकरच याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांना आमदार नियुक्तीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केल्याचं सांगितलं. 12 आमदारांच्या यादीतील कोणाची नावे वगळण्याबाबत कसलीही चर्चा झाली नाही, किंवा राज्यपालांनीही कोणत्याही नावावर आक्षेप घेतलेला नसल्याचं थोरात म्हणाले.