मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केलंय. 


महत्त्वाची बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे उपस्थित राहीले तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील या बैठकीत सहभागी झाले.


अधिवेशनात सरकारला घेरण्यावर दोघांत एकमत झालंय. भविष्यात एकत्र काम करण्याबद्दल चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.


तर काही मुद्यांवर वरिष्ठ पातळीवर अर्थात सोनिया गांधी - शरद पवार यांच्यात चर्चा होईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलंय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली रणनिती, लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, सरकारविरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबतही प्राथमिक चर्चा या बैठकीच्या निमित्तानं पार पडलीय.


मतांची विभागणी टाळणार


आजच्या बैठकीत विद्यमान राजकीय स्थिती, आगामी निवडणुका आणि अधिवेशनात सरकारविरोधात एकजुटीनं उभं राहण्याबाबत चर्चा करण्यात आली. मतांची विभागणी होऊ नये यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नमूद केलं. तसंच दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.


भाजपसाठी डोकेदुखी?


त्यामुळे, तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन दोन्ही पक्षांमध्ये आगामी निवडणुका एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याचं दिसतंय. यामुळे भाजपची डोकेदुखी मात्र नक्की वाढणार आहे.