मुंबई : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय. मंजुळा शेट्ये प्रकरण तपास यंत्रणा संपवू पाहतेय का? असा खरमरीत सवाल कोर्टानं विचारला. तपास यंत्रणांचं नक्की चाललंय तरी काय? असाही सवाल न्यायलयानं संतप्त होऊन केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याची माहिती आज गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. मंजुळाच्या शरीरावर १७ जखमा होत्या..शिवाय तिच्या मेंदूलाही दुखापत होती असं रणजीत पाटील यांनी म्हटलंय.  


दरम्यान पोलिसांनी कोर्टात मंजुळाच्या शरीरावरच्या जखमा बाथरूममध्ये पडल्यानं झाल्याचा जबाब नोदंवलाय. त्यामुळे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आणि पोलीसांनी कोर्टाला दिलेल्या जबाबात तफावत आहे. याविषयी उत्तर देताना रणजीत पाटील यांनी खोटं प्रतिज्ञानापत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईचे संकेत दिले.


भायखळा तुरुंगात झालेल्या मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी खोटं प्रतिज्ञापत्र देणाऱ्या ड़ॉक्टरांना निलंबित करण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिलं. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी याविषयीची मागणी केली होती. मंजूळा शेट्येच्या शरीररावर असणाऱ्या जखमा मारहाणीच्या नसून बाथरुममध्ये पडून झालेल्या होत्या असं पोलीसांनी कोर्टात सांगितलं.


याप्रकरणी सहा महिला पोलीस कर्मचारी आरोपी आहेत. त्यामुळे पोलीस अधिका-यांना वाचवणाचा प्रयत्न कऱणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई करण्याची मागणी विखेपाटील आणि शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय.