मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांच्यावर काही दिवसांपूर्वी रेणू शर्माने (Renu Sharma)  बलात्काराचा आरोप केला होता. मात्र या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. या मुद्यावरून विरोधकांनी प्रकरण चांगलच तापवलं होतं. मात्र आता तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांवर (Ajit Pawar aggresive on opposition) चांगलेच संतापलेले दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आता विरोधकांना काय म्हणावं. एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो,' अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.


धनंजय मुंडेंच्या या प्रकरणावरून विरोधकांनी टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख केला नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की,'धनंजय मुंडे यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता'.



  


पंकजा मुंडेंनी देखील धनजंय मुंडेंच्या या प्रकरणावर काल भाष्य केलं होतं. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की,'विषय मागे पडला आहे, नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करू शकत नाही, अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नाते म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशील पणे पाहते. हा विषय कोणाचाही असता तारी राजकीय भांडवल केलं नसते आणि करणारही नाही, बाकी सगळ्या गोष्टींचा निकाल भविष्यात लागेल.' असं त्या म्हणाल्या.