प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : कोण घाबरवतंय मुंबईला, या प्रश्नाचा तपास सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईत घडली. शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनसदृश वस्तू सापडल्या. आधी ते जिलेटीनच्या कांड्या असल्याचं बोललं जात होतं. नंतर ते फटाके असल्याचं बोललं गेलं. या स्फोटकांबरोबर भाजप सरकारसाठी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामुळे या प्रकरणातलं गूढ वाढलंय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमधल्या हावडाहून आलेली शालिमार एक्सप्रेस एलटीटी स्थानकात शिरली. गाडी रिकामी झाल्यावर सफाई कामगार गाडीत शिरले आणि त्यांना धक्काच बसला. जिलेटीन कांड्यासारखी दिसणारी स्फोटकं गाडीमध्ये सापडली. ताबडतोब पोलीस, श्वान पथक, बॉम्ब निकामी पथक, शहर पोलीस, दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी पोहोचलं.


उरणमध्ये दहशतवादासंदर्भातला संदेश सापडल्यापाठोपाठ ही घटना घडल्यानं पोलीस त्या दिशेनं तपास करू लागले. पण नंतर हे फटाके असल्याचं समोर आलं. पण आधी पोलीस जिलेटीन म्हणाले मग फटाके म्हणाले त्यामुळे याप्रकरणातला संभ्रम वाढलाय. 


उरणमधली घटना आणि ही स्फोटकं याचा गांभीर्यानं तपास होणं गरजेचं आहे. दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांना अटक व्हायला हवी.