मुंबई : गणपती उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा २२०० गाड्या सोडण्यात येणार आहेत. या जादा गाड्यांच्या आरक्षणासाठी २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने या जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० गाड्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाकर रावते यांनी केले आहे. येत्या २७ जुलैपासून (एक महिना आधी) संगणकीय आरक्षण उपलब्ध असणार आहे. 


दरम्यान, परतीच्या प्रवासाचे आरक्षणही एकाचवेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे. २० जुलैपासून ग्रुप आरक्षणाला सुरुवात होणार आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरातील १४ ठिकाणाहून जादा गाड्या सुटणार आहेत.


तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली  आहे. कोकणातील महामार्गावर ठिक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.