मुंबई : घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.  


काही जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर काहींना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये नेण्यात आलेय. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. घाटकोपरमधल्या दामोदर पार्क भागातल्या साई दर्शनमधील रहिवासी इमारत सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोसळली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही इमारत धोकादायक नसल्याची माहिती महापालिका आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. 


 घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचं बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आलंय. शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील शीतप याचं हे रुग्णालय असल्याचं उघड झालंय. त्यानं विद्या खाडे नावाच्या महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होतं. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे हॉस्पिटल सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वीच नुतनीकरण करताना आतले कॉलम तोडण्यात आले होते.


सुनील शितपनं रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांना रहिवाशांनी विरोध दर्शवला होता. रहिवाशांनी केलेल्या विरोधाला न जुमानता शितपनं जबरदस्तीनं हे काम सुरू ठेवलं होतं. तसंच रहिवाशांना धमकावल्याचंही बोललं जातंय. या  बांधकामामुळंच इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांनीही केलाय. तर दुसरीकडे या दुर्घटनेला जबाबदार धरून एन वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 


घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला.पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीचा त्यांच्यासमोरच अंत झाला. तर आई अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे. त्यांचा नऊ वर्षांचा  मुलगा ट्युशनला गेल्यामुळे सुदैवाने बचावला. घाटकोपरमधील बिल्डिंग ही नर्सिंग होमच्या बांधकामामुळे पडल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहेत.