मुंबई : कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे अनलॉक-३ मध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे. परंतु  यासाठी उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्य प्रणालीचे पालन करण्याची हमी देणारे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळावारी उद्योगमंत्र्यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली.  यावेळी उद्योग सचिव  वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते. यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, तळोजा, औरंगाबाद, नागपूर आदी भागातील उद्योजकांनी सूचना केल्या. यावेळी कंटेनमेंट झोन परिसरातील अत्यावश्यक  सेवा देणाऱ्या उद्योगांसोबत इतर उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. 



दरम्यान, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगचक्र  पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत. परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे, सॅनिटायझेन, वाहतूक व्यवस्था आदी बाबीं पाळणे आवश्यक आहे.  शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची हमी देणारा प्रस्ताव सादर केल्यास शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे देसाई यांनी सांगितले.


मुंबई व परिसरात ज्या भागांत कोरोनाचा प्रभाव नाही, त्याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह उद्योग सुरू करण्यासाठी शासन नक्कीच विचार करील, असेही  देसाई यांनी सांगितले. नागपूर, औरंगाबाद व इतर ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. त्या सोडविण्याची ग्वाही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांनी दिली.