मुंबई : कोरोनाबरोबरचे (Coronavirus) युद्ध लढत आहोत. आपल्याकडे मास्क (Mask) हीच ढाल आहे. त्यामुळे मास्क घालणं हे अनिर्वाय आहे. लस आली आणि घेतली तरी मास्क घालणे हे बंधनकारक आहे. मंगळवारपासून राज्यातील मोठ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ((Uddhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थितीनुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सगळेच कोरोना युद्धात झोकून काम करत होते. पोलीस, डॉक्टर, शासकीय कर्मचारी सगळेच काम करत होते. आपण एका धीराने ही लढाई लढत होतो. आता पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे. दुसरी लाट आली की नाही, याबाबत अजूनही निदान झालेले नाही. आपण अनलॉक केले. सगळे हळूहळू सुरु केले. मात्र, गर्दी टाळण्याची गरज आहे. आपण कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.


तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच, असे त्यांनी यावेळी सांगितले.  मास्क घालणे अनिवार्य आहे. शिस्त पाळणे हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्हाला लॉकडाऊन हवे की नको, हे तुम्हीच ठरवा, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.



राज्यात कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ही लाट आहे की नाही आठ ते पंधरा दिवसात समजेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, राज्य सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना तातडीने निर्णय घेऊन पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसे प्रशासनाला सांगितले. त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादबरोबर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्येही कोरोनाने डोके वर काढले आहे. इतर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.