Navi Mumbai: नवी मुंबईत एक मोठी घटना घडली असून या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे. नवी मुंबईच्या विविध परिसरातून 24 तासांमध्ये 4 अल्पवयीन मुली आणि 2 मुलं बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली आहे. 


4 डिसेंबर रोजी बेपत्ता झाली मुलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेविषयी माहिती देताना पोलीस म्हणाले, 12 ते 15 वर्षांची अल्पवयीन मुलं 3 ते चार डिसेंबर रोजीच्या दरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सहा मुलांपैकी एक सोमवारी कोपरखैरणेमधून बेपत्ता झाला. तर एक 12 वर्षीय मुलगा या घटनेनंतर ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. त्याची माहिती घेता या मुलाला कुटुंबियांकडे सुखरूप सोपवण्यात आलं आहे. 


या घटनांमागे कोणाचा हात?


दरम्यान नवी मुंबईमध्ये घडणाऱ्या या घटनांमागे नेमका कोणाचा हात आहे याची तपासणी सध्या सुरु आहे. या सर्व प्रकरणांमागे एखाद्या टोळीचा हात आहे का, याचीही पडताळणी पोलिसांकडून सुरु आहे. सध्या तरी बेपत्ता झालेल्या मुलांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


यासंबंधी दुसऱ्या घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कळंबोलीतील परिसरातून एक 13 वर्षीय मुलगी तिच्यासोबत शिकत असलेल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गेली होती. मात्र ती घरी परतलीच नाही. अजून एका प्रकरणामध्ये पनवेलमध्ये एक 14 वर्षीय मुलगी रविवारी सहकाऱ्याच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेली होती आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. कामोठे परिसरात एक 12 वर्षी मुलगी सोमवारी घरातून बाहेर पडली आणि ती बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. 


याशिवाय सोमवारी 1 वर्षीय मुलगी शाळेसाठी रबाळे परिसरात जायला घरातून निघाली आणि ती पुन्हा घरी परतलीच नाही. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या घटनेव्यतिरीक्त रबाळे परिसरातील एक 13 वर्षांचा मुलगा सोमवारी सार्वजनिक शौचालयात गेला होता, त्यानंतर त्याचा काहीच पत्ता सापडेना. 


सर्व घटनांची पोलीस स्टेशनमध्ये नोंद


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवी मुंबई घडलेल्या या सर्व घटनांची नोंद स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय सर्व बेपत्ता मुलांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.