मुंबई : मुंबईतल्या मुलुंडमध्ये राहणारा जगदीश दलाराम परिहार हा २३ वर्षीय तरुण मंगळवारपासून बेपत्ता आहे. तो पाकिस्तान किंवा आखातात पळून गेल्याचा संशय व्यक्त होतोय. 'हिंदू धर्म आवडत नाही म्हणून मुस्लीम धर्म स्वीकारला' असं फोनवर शेवटचं सांगून त्यांनं सर्व संपर्क बंद केला. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकतोय. गेलं वर्षभर तो फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कमध्ये होता. 


याबाबत त्याच्या कुटुंबानं वारंवार त्याला हटकलं. पण तरीही जगदीश तिच्या संपर्कात होता. 


जगदीशनं फेसबुक अकाउंटही बंद केलंय. दोन दिवसांपूर्वी त्यानं खात्यातून काही रक्कमही काढली. त्याचं शेवटचं संपर्क ठिकाण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याचं समजतंय. 


इथूनच त्यानं भाऊ, भावेशला शेवटचा फोन केला. त्यानं सर्व महत्त्वाची कागदपत्रंही सोबत नेल्याचं समजतंय. 


सध्या मुलुंड पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत. त्याच्या बेपत्ता होण्याशी पाकिस्तानाचा संदर्भ असल्यानं पोलिसांनी प्रकरण गांभीर्यानं घेतलंय.