मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता सर्व राज्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती आणि राहील. पण बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणालाही न जुमानता अंहकारातून विद्यार्थ्यांचे नुकसान केले, एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला, विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले, शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. 




सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. मात्र परीक्षा केव्हा आणि कशा घ्याव्यात याचा निर्णय संबंधित राज्य सरकारांवर आहे, यूजीसीच्या 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीच्या आग्रहानुसार नसल्याचंही, न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 


'सर्वोच्च न्यायालयाने केवळ युजीसी नव्हे तर राज्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार दिला'