मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वाराजवळ कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी  दि. ५ आणि ६ सप्टेंबर, २०२ रोजी सकाळी  १० वाजता ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरटी-पीसीआर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीस विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोमवार‍ ७ सप्टेंबर, २०२० पासून विधानभवन, मुंबई येथे सुरु होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.  


सदस्यांच्या वास्तव्याच्या नजीक असलेल्या अधिकृत प्रयोगशाळेचा ४ सप्टेंबर, २०२० नंतर केलेला आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाला सादर करता येईल अथवा तशी सुविधा उपलब्ध होत नसल्यास विधानभवन, मुंबई येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा वापर केला जाऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री तसेच मंत्री परिषदेतील सर्व मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या सोबतचे स्वीय सहायक यांना विधानभवन इमारतीत प्रवेश करण्यासाठी ही चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मंत्रालयातील आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील ही चाचणी बंधनकारक असून तरच प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.