दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक भाजपाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. तसंच 2019 च्या राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची ही पोटनिवडणुक लिटमस टेस्ट ठरणार आहे. भाजपावर टीका करत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानं भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती, तर खासदार चिंतामण वानगा यांच्या निधानानं पालघरची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही जागांवर पोटनिवडणुक जाहीर झाली असून 28 मे रोजी मतदान आणि 31 मे रोजी मतमोजणी होत आहे. 


महाराष्ट्रात भाजपला पोटनिवडणुकीत विजय आवश्यक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय पतंगराव कदम यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पलुस-कडेगाव विधानसभेसाठीही पोटनिवडणुक होत आहे. 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदियाची जागा भाजपाने 1 लाख 49 हजार मतांनी जिंकली होती, तर पालघरची जागा 2 लाख 40 हजरा मतांनी जिंकली होती. मात्र मागील चार वर्षात राज्यातील चित्र बदललं आहे. त्यामुळे या दोन्ही जागा राखणं हे भाजपासाठी आव्हानात्मक असणार आहे. 


भाजपला पोटनिवडणुकीत फारसं यश नाही


यापूर्वी राजस्थानमधील दोन आणि उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला आपल्या जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळेच भाजपासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी लोकसभेच्या दोन जागांची पोटनिवडणुक परीक्षा पाहणारी ठरणार आहे. राज्यातील बदललेले राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांमधील अस्वस्थता, शिवसेना साथ देणार नसल्याची शक्यता, तर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऐकी हे मुद्दा भाजपासाठी अडचणीचे ठरणार आहेत. 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ही पोटनिवडणुक होत असल्याने ती भाजपासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे.