मुंबई : Maharashtra Corona : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) दिवसागणिक वाढत आहे. मुंबई (Mumbai) - ठाण्यात (Thane) कोरोना बाधितांचा (Covid-19) आकडा वाढताना दिसत आहे. त्याचवेळी राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी कडक करण्यात आली आहे. असे असताना मुंबई आणि ठाणेमध्ये एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांची भर पडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतानाच दिसत आहे. देशात 24 तासांत 25 हजार 320 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 1 कोटी 13 लाख 59 हजार 48 कोरोनाग्रस्त आहेत. गेल्या 24 तासांत 161 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 58 हजार 607 जणांचा बळी गेला आहे. कोरोनावर गेल्या 24 तासांत 16 हजार 637 जणांनी मात केली असली तरी सध्या देशात 2 लाख 10 हजार 544 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


राज्यात कोरोनाचे 15 हजार नवे रुग्ण नोंदवले, तर देशातही तब्बल 24 हजार 882 नव्या रुग्णांची भर पडली. अनेक जिल्ह्यांत कडक निर्बंध आणि मिनी लॉकडाऊन केल्यानंतरही महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चिंताजनक चित्र आहे. कोरोनाचा धोका कायम आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई, ठाण्याची चिंता वाढली आहे. एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.  ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण य़ामुळे रूग्ण संख्या वाढत असल्याचे निरीक्षण आहे. केंद्रीय आरोग्य टीमनेही याबाबत चिंता व्यक्त केली होती. 


दरम्यान, पालघरचे १८० वऱ्हाडी डेस्टिनेशन वेडींगसाठी विमानाने राजस्थानला गेले होते. मात्र हे वऱ्हाडी पालघरमध्ये परतल्यावर त्यातल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासन यंत्रणा अलर्टवर आहे. सर्वच्या सर्व 180 वऱ्हाड्यांना तहसलिदारांनी तात्काळ कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिलेत.  


तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला येथेही रुग्णसंख्या वाढत आहे. तर धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 264 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. धुळ्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे.जिल्ह्यात 2 हजार 246 कोरोनाचे  रुग्ण सक्रिय आहेत. एकट्या धुळे शहरात 1294 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात  संध्याकाळपासून जनता संचार बंदी लागू झालीय.बुधवार सकाळपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.


जळगाव आणि नंदुबार जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा वढाला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 24 तासांत नव्या 214 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त रुग्ण हे नंदुरबार शहरातीलच आहेत.त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.