मुंबई : महाराष्ट्रात लवकरच कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave in Maharashtra) येण्याची शक्यता आहे. जगभरात कोरोनाबद्दल जे घडतंय त्यावरुन हा अंदाज वर्तवला जातोय. कोरोना गेला या भ्रमात राहून तुम्ही मास्क नीट घालणं सोडून दिलं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण महाराष्ट्रावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट आलंय. पाहुया महाराष्ट्रात कधी येऊ शकते कोरोनाची चौथी लाट. (maharashtra in danger of fourth wave of corona due to corona condition in the world)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना वेगानं वाढतोय. ओमायक्रॉन आणि त्याचा सबव्हेरियंट BA2 नं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे.  युरोपीय देशांमध्ये एका दिवसातच ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळलेत.



महाराष्ट्रात सध्या रोज दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळतायत, पण पाहता पाहता हा आकडा वाढू शकतो.  महाराष्ट्रात आणि भारतात जूनच्या आसपास कोरोनाची चौथी लाट येईल, असा अंदाज IITकानपूरनं वर्तवलाय. तीन ते चार महिने ही चौथी लाट राहील, असाही अंदाज आहे. 


त्यामुळे मास्कमुक्ती तर विसराच पण इतर सर्व नियम पाळून कोरोनापासून सावध राहा, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. तर चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपसह जगभरातच कोरोना वाढत असल्यामुळे खबरदारीचा इशारा WHO नंही दिलाय.


जगभरात का वाढतोय कोरोना?


ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात कोरोना वाढू लागलाय. इस्राईलमध्ये BA 1 आणि BA 2 मिळून आणखी एक नवा व्हेरियंट सापडलाय.हे नवनवे व्हेरियंट किती धोकादायक आहेत, यावर अभ्यास सुरू आहे. कोरोनाचा संपूर्ण खात्मा व्हायला अजून बराच काळ जाणार आहे. त्यामुळे बेफिकीर होऊ नका आणि आरोग्याची काळजी घ्या.