मुंबई : राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसात सातत्याने चढउतार पाहिला मिळतोय. गेल्या चोवीस तासात राज्यात ९०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासात ७६७ जणांना कोरोनावर मात केली आहे. राज्यात रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के इतका झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रुग्णांचा आकडा तिपटीवर
कोरोनाच्या पहिल्या लाटेत डिसेंबर महिना कोरना रुग्णसंख्या वाढीच्या दृष्टीने धोक्याचा ठरला होता. कमी झालेली रुग्णसंख्या डिसेंबरमध्ये वाढू लागली आणि दुसरी लाट फोफावली होती. आता पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेत कमी झालेली रुग्णसंख्या डिसेंबरमध्ये वाढू लागल्याची चिन्ही दिसत आहेत.


मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली होती. १ डिसेंबरला मुंबईत १०८ रुग्ण सापडले होते. पण त्यानंतरच्या १५ दिवसात रुग्णसंख्या वाढत असून ३०० पार गेली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात ३३६ रुग्ण सापडले आहेत. तर २०१ जण बरे होऊन घरी परतले. 


डिसेंबरमध्ये वाढलेली रुग्णसंख्या कमी होण्यास पुढचे किमान चार महिने लागता, हा दुसऱ्या लाटेतला अनुभव आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे.


मुंबईत सध्या विविध रुग्णालयात २०८१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी २२८८ इतका झाला आहे.