देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळले आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरून सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसाउजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत. कालाय तस्मै नम: , जे पेरलं ते उगवलं, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...


२०१७ साली शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक गळाला लावले होते. यामध्ये मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांच्यासह अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, हर्षला मोरे आणि दत्ताराम नरवणकर यांचा समावेश होता. त्यामुळे पालिकेतील मनसेच्या उरल्यासुरल्या अस्तित्त्वाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच आज संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करुन उट्टे फेडले आहे. 



'कोरोनाची भीती असूनही फडणवीस रोज फिरतायंत, पण उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत'


याशिवाय, संदीप देशपांडे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून सुरु असलेल्या गोंधळावरुनही राज्य सरकारला लक्ष्य केले. दिल्ली म्हणतेय परीक्षा घ्या, राज्य म्हणतंय परीक्षा नको. मधल्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. कुठल्याही गोष्टीची स्पष्टता आणि नियोजन यांच्याकडे नाही. आधी विद्यार्थ्यांची मानसिकता केली की परीक्षा नाही, आता परीक्षा घेणार असे सांगितले जात आहे. यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी  दिल्लीकडे दुर्लक्ष करून स्वतःचे निर्णय घ्यावेत, असेही देशपांडे यांनी म्हटले.