MP Varsha Gaikwad On Ashok Chavan: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला 'रामराम' करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आले. यानंतर लोकसभा निवडणुकीत नांदेडच्या जागेवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यानंतर आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा गायकवाड यांना नांदेडमध्ये आल्यावर अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर वर्षा गायकवाड यांना अशोक चव्हाण यांच्या पक्ष बदलाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वर्षा गायकवाड यांनी मला अशोकराव चव्हाण यांना काहीही संदेश द्यायचा नाही. मुंबईतील अनेक मंडळी पक्ष सोडून गेली. मी सर्वांना सांगतेय की, नांदा सौख्यभरे… जिथे आहात तिथेच पूर्णपणे राहा. सुखी राहा हीच मी या ठिकाणी अपेक्षा करते. मी पक्षाकडे विनंती करते की जे गेले त्यांना जाऊ द्यावं. नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.  


स्वार्थासाठी गेले त्यांना घरी बसवायचं


अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपला फायदा झाला की तोटा झाला याचं आत्मचिंतन त्यांनी स्वत: करावं. जे स्वार्थासाठी गेले, सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली गेले, पैशाच्या अमिषापोटी गेले त्यांना यावेळी घरी बसवायचं, असे जनतेने ठरवलं होतं. दुर्दैवाने काही लोकांना असं वाटायला लागलं की आम्ही जे सांगू तिथे जनता मतदान करेल. आम्ही जिकडे जाऊ, तिकडे जनता मतदान करेल असं नाहीये, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.  


नांदेडच्या जनतेचे आभार 


नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना निवडून दिल्याबद्दल मी नांदेडच्या जनतेचे आभार मानते. माझे वडील सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांच्या प्रचारासाठी नांदेडला यायचे, त्यामुळे माझे ऋणानुबंध आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. तर परभणीचे संपर्क मंत्री म्हणून काम केलं. मराठवाड्याशी माझा संपर्क आहे. हिंगोलीमध्ये काँग्रेसचा स्ट्रॉंग बेस आहे. पूर्वी राजीवभाऊ होते. दुर्दैवाने त्यांच्या जाण्याने पक्षाचे नक्कीच नुकसान झालं आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.