मुंबई: भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आलेले विकासाचे डबल इंजिन मॉडेल महाराष्ट्रात सपशेल अपयशी ठरले आहे. जागतिक मंदीमुळे महाराष्ट्र अनेक गंभीर समस्यांना तोंड देत आहे. एकेकाळी गुंतवणूक आकर्षित करण्यात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आजघडीला देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य झाले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, भाजप सरकार लोकाभिमुख धोरणे राबवत नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अलीकडची विधाने पाहता त्याचा प्रत्यय येईल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. 


यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गंभीर आर्थिक परिस्थितीवरही भाष्य केले. राज्यातील उत्पादनाचा विकासदर गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने खालावत आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे राज्यापुढे गंभीर समस्या उभ्या ठाकल्या आहेत. सरकारचे औदासीन्य आणि अकार्यक्षमतेमुळे यामध्ये आणखीनच भर पडली आहे. गेल्या चार वर्षात मंदीमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी उद्योगक्षेत्राच्यादृष्टीने चैतन्यदायी वातावरण असलेल्या राज्यात संधींचा दुष्काळ निर्माण झाला आहे. राज्यातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील अनेकजण बेरोजगारीमुळे स्थलांतर करत असल्याची टीका मनमोहन सिंग यांनी केली. 


वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या साच्यात राहून बेरोजगारी नियंत्रणात आणण्याचा परिणामकारक उपाय सापडणार नाही. त्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी नेमके धोरण आखले पाहिजे. मात्र, त्यासाठी बराच अवधी जावा लागेल, असेही मनमोहन सिंग यांनी सांगितले.