मुंबई : शहरातील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्यावतीने करण्याची ग्वाही  शेख यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा उत्तरेकडील भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल व महानगरपालिकेच्या वतीने अद्याप शोध मोहिम सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.



घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले.  ढिगारा उपसण्याचे काम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना  शेख  प्रशासनाला दिल्या.


मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.