मुंबई : देशभरात लॉकडाऊन सुरु असताना आणि कोरोना व्हायरसची दहशत असताना मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मात्र दुपारनंतर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मुळचे उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते. आपल्या राज्यात नेण्यासाठी लांब पल्ल्याची गाडी सोडण्याची मागणी त्यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी २१ दिवसांपूर्वी लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस. पण, Coronavirus कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. आता ३ मे रोजी लॉकडाऊन शिथिल केला जाईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे घरी जाण्याची आशा मनी बाळगून आलेल्या या कामगारांचा उद्रेक यावेळी उडाल्याचं पाहायला मिळालं. 


वांद्रे भागात असणाऱ्या अनेक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या या कामगारांनी टर्मिनसबाहेर जमत एक्स्प्रेस गाडी सोडण्याची मागणी केली. हजारोंच्या संख्येने झालेली ही गर्दी पाहता  पोलिसांनी अथक प्रयत्नांनतर ही गर्दी पांगवली. लॉकडाऊनच्या काळात कारखान्यांमधील आणि दुसऱ्या राज्यांतील हे कामगार अतिशय कठीण परिस्थितीमध्ये राहत आहेत. शिवाय सोशल डिस्टंसिंगचंही पालन करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी स्वगृही परतण्याचा सूर आळवला होता. 



अखेर काही स्थानिक आणि पोलिसांच्या आवाहनानंतर ही गर्दी पांगवण्यात आली. लॉकडाऊनचा काळ वाढवला गेल्यामुळे आधीच नाराज असणाऱ्या या वर्गाचा असंतोष मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानकाबाहेर पाहायला मिळाला. त्यामुळे आता आपल्या घरी परतण्यासाठी निघालेल्या या मजुरांसाठी केंद्र सरकारकडून काही पावलं उचलली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.