देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : आगामी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) स्वबळावर सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवेल असे स्पष्ट संकेत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात अमित ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांशी राजगड पक्ष मुख्यालयात बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी शाखाध्यक्षांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित ठाकरे यांचा शाखाध्यक्षांशी संवाद
मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर मुंबईतील परप्रांतीय समाज - विशेषत: उत्तर भारतीय आणि गुजराती समाज मनसेकडे आकृष्ट झाला आहे. हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज सर्वांना भासत असून आगामी निवडणुकीत मराठी माणसासोबत गुजराती तसंच हिंदी भाषिक मतदारही मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान करतील अशी अपेक्षा पक्ष बाळगून आहे.


राज ठाकरे यांनी भोंग्यांचा संदर्भात लिहिलेलं पत्र मुस्लिमबहुल भागात वितरीत करण्यासाठी शाखाध्यक्ष गेले असताना त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. मात्र स्थानिक पातळीवर हिंदू समाज एकवटला आहे. राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिका आणि करोना संकटकाळात मनसे शाखाध्यक्ष तसंच महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं सामाजिक कार्य यांमुळे स्थानिक पातळीवर मतदारांच्या मनात मनसेविषयी चांगली भावना आहे.