Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) वातावरणाची रंगत आता वेगानं वाढत असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय सूर कानी येत आहेत. नेते मंडळींची मतमतांतरं जितक्या पोटतिढकीनं समोर येत आहेत तितक्या किंबहुना त्याही वेगानं या नेतेमंडळींच्या पक्षांतराचे निर्णय थक्क करून जात आहेत. अशा या संपूर्ण वातावरणात देशाच्या आर्थिक राजधानीपुढं म्हणजेच मुंबईपुढं एक मोठी अडचण उभी राहताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईपुढं असणारी ही अडचण शहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात असून, हा गंभीर प्रश्न पाहता आता अनेक नागरिकांनी 'निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला' असा सूरही आळवण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार येत्या काळात मुंबईतही मतदान प्रक्रिया निर्धारित तारखेला  पार पडणार असून, त्याआधीपासून या निवडणुकीच्या कामासाठी शासकीय सेवेतील अनेकांनाच रुजू होण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. 


मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातून या विभागासाठी काम करणाऱ्या 'चावीवाला' पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. जर ही मंडळी निवडणुकीच्या कामावर रुजू झाली तर, शहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे. ज्यामुळं आता पालिकेकडून हे आदेशरद्द करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 


(Mumbai Loksabah election Voting Day 2024) मुंबई शहरात 20 मे रोजी सह मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यासाठी कैक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी म्हणून सज्ज असणाऱ्या तानसा, मोडकसागर, भातसा, तुळशीविहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा अशा धरणांमधून वेगवेगळ्या वेळांना साधारण दर दिवशी 3950 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तीन पाळ्यांमध्ये काम करणारे पाणीपुरवठा विभागातील 'चावीवाला' कर्मचारी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि अगदी सहजपणे शहरातील असंख्य घरांमध्ये असणाऱ्या नळांना, विविध उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. 


हेसुद्धा वाचा : जगभरात 'या' एका व्यक्तीला मिळतोय सर्वाधिक पगार? 


 


निर्धारित वेळेत शहरातील विविध विभागांना पाणीपुरवठा सुरू करून तो बंद करणं, चावी नेमकी कशी आणि कितीवेळा फिरवावी, पाण्याचा दाब नियंत्रीत कसा करावा अशा अनेक गोष्टींची काळजी या कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. या कामात कमालीच्या सुसूत्रतेची गरज असते, अन्यथा एक लहानशी चूक शहरातील पाणीपुरवठ्याचं गणित बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. प्रत्यक्षातच या विभागातील कर्मचाऱी क्षमतेहून कमी संख्येनं सेवेत आहेत त्यातच आता कामावर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठीचे आदेश दिल्यास शहरातील पाणीपुरवठा गडबडण्याची किंवा ठप्प होण्याचीच भीती व्यक्त केली जात आहे.