मुंबई  : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता तिहार तुरूगांत फाशी देण्यात आली. दोषींना फाशी दिल्यानंतर सगळ्यांनी निर्भयाला आज खऱ्या अर्थांनी न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली जात आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील ट्विटरवर आपली भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशने ट्विटमध्ये निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत #JusticeForNirbhaya असा हॅशटॅग वापरला आहे. 'माझ्या सद्भावना या निर्भयाचे पालक, नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत आहेत. बराच वेळ वाट पाहावी लागली पण अखेर निर्भयाला न्याय मिळाला. अशाप्रकारचा भयंकर गुन्हा करणाऱ्याचा विचारही कोणाच्या मनात येऊन नये अशी दहशत निर्माण करायची असले तर कायदे कठोर करणं गरजेचं आहे. कठोर शिक्षा, जलद गतीने होणारा न्यायनिवाडा हेच असे गुन्हे थांबवण्याचा मार्ग आहे,' असं ट्विट रितेश देशमुखने शेअर केलं आहे. 




निर्भयाच्या चारही दोषींना सकाळी साडे पाच वाजता फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये तरूणीवर सामुहिक बलात्कार केला होता. या तरूणीवर अमानुष असे पाशवी कृत्य करण्यात आले. तरूणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूनंतरही पालकांनी मुलीला न्याय मिळावा म्हणून लढा चालूच ठेवला. अखेर आज पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे.