मुंबई : पनवेल-कर्जत आणि ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या कामाला आता अधिक गती येणार आहे.  एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान वर्षा येथे यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रसंगी नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर एस खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा यांची उपस्थिती होती. 



मुंबई आणि उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-III) या  .१०,९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्प पूर्णत्व किंमतीच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पास मंजुरी दिली होती. राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा- २ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे.


या करारामुळे या प्रकल्पांना वेग येणार


- पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे २७८३ कोटी  


- ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी उन्नत रेल्वे मार्ग बांधणे.४७६ कोटी 


- विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) ३५७८ कोटी 


- नवीन रेल्वे गाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) ३४९१ कोटी 


- मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल. ५५१ कोटी 


- तसेच तांत्रिक सहाय्य ६९ कोटी