मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गेल्या काही दिवसांत कुणीही पाहिलेलं नाही. ईडीनं (ED) चौकशीसाठी त्यांना वारंवार समन्स पाठवले. पण देशमुख ईडी चौकशीसाठी कधीच हजर झाले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्या आरोपांमुळं देशमुखांना गृहमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं, ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) हे देखील परदेशात गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरूय. परमबीर देश सोडून गेलेत का? असा प्रश्न NIA, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना पडलाय. अँटेलिया स्फोटकं (Antilia case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren) प्रकरणाचा तपास NIA करतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी परमबीर सिंग यांचा शोध सुरु असल्याचं म्हटलं आहे. सरकारी अधिकारी असल्यामुळे परदेशात जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे, जर ते गेले असले तरी ती चांगली गोष्ट नाही,  मंत्री असो कुणीही अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाण्यास परवानगी नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


याबाबत केंद्रीय सरकार काय निर्णय करेल हे पाहावे लागेल, महाराष्ट्र सरकार सध्या त्यांना शोधत आहे, डिसेंबरमध्ये परमबीर यांच्यावर कारवाईबाबत निर्णय होईल,  ते उपस्थित न राहिल्यास बाबत कारवाई होऊ शकते असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत त्या प्रश्नाचा हिशोब त्यांच्याकडून घ्यायचा आहे, रुटींग प्रोसेस आहे आम्ही जाणून बुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाही, जे नियमाला धरून असेल तेच होईल असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. 


परमबीर सिंह बाहेर गेले असल्याची कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही, आमचे अधिकारी केंद्र सरकारबरोबर समन्वय करत आहेत असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.