दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एम. पी. मिल कंपाऊंड एफएसआय घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरविल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एफएसआय प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. यामुळे संबंधित बिल्डरला तब्बल ५०० कोटींची फायदा झाला होता. मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. परंतु, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती. यावरून विधानसभेत जोरदार हंगामा झाला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठवले होते.


त्यानुसार लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. ताहलीयानी यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश मेहता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, आता मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, या मंत्र्यांना फडणवीस यांनी परस्पर क्लीन चीट देऊन टाकल्याचा आक्षेप विरोधकांकडून कायम घेतला जातो.