मुंबई : पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्या ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. आता मध्य रेल्वेने या तारखेत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई - पुणे आणि पुणे - मुंबई असा तसेच अन्य ठिकाणी रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे एसटीची सेवा व्यवस्थित नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी आता १६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्याही ११ ऑगस्टपर्यंत धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाड्या रद्द करण्यात आल्याच रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. 


अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात तसेच मिरज-लोंडा (कर्नाटक) विभागात लोहमार्गावर पाणी येऊन ते खचले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अन्य लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, सह्यद्री एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस या गाड्याही ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


मुसळधार पावसामुळे डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या गाड्याही गेल्या काही दिवसांपासून रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत एकही रेल्वे नाही. आता त्यात पु्न्हा वाढ झाली आहे. १६ ऑगस्टपर्यंत रेल्वे सेवा बंद राणार आहे. तसेच या मार्गावर खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचेही दिसून येत आहे.