मुंबई : Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आल्याने निवडणुकीची चुरस वाढलीय. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता निकाल स्पष्ट होणारा आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार आहेत. विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.


कशी होणार निवडणूक?


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.

  • विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल

  • मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार

  • मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार आहे. 


 


शिवसेनेचे सर्व आमदार आणि समर्थक आमदार सकाळी 8 वाजता ट्रायडंट हाँटेलमधून बसने विधान भवनात येतील. त्यानंतर या सर्व आमदारांची विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात महत्वाची बैठक होणार आहे. त्यासाठी शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्व आमदारांना शिवसेनेचा व्हिपही बजावला आहे.


 


शिवसेना पक्ष कार्यालयात होणा-या या महत्वाच्या बैठकीत सर्व आमदारांना त्यांनी कोणाला पहिल्या क्रमांची मतं द्यायची आहेत आणि कुणाला दुस-या क्रमांकाची मतं द्यायची आहेत याची माहीती दिली जाईल. त्यानंतर शिवसेना पक्षाने सांगितल्याप्रमाणे सर्व आमदार मतदान करणार आहेत. कोणत्याही आमदाराचे मत बाद होणार नाही याचीही काटेकोरपणे काळजी घेण्यात येत आहे.




एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा


महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. पाठिंबा दिला तरी राजकीय वैचारिक मतभेद कायम राहणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.


इतर राज्यातही निवडणुका


महाराष्ट्रासह आज हरयाणा, राजस्थान आणि कर्नाटक या चार राज्यांत राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या चारही राज्यांतून राज्यसभेच्या 16 जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. 


महाराष्ट्रात 24 वर्षातून प्रथमच निवडणूक होत आहे. आतापर्यंत 11 राज्यांतील 41 राज्यांतील 41 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. मात्र कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानात अधिकचे उमेदवार उभे राहिल्यानं या चार राज्यांत निवडणूका होणार आहेत.