मुंबई : सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही छत्रपती यांच्या विधानांचा वेगळा अर्थ काढू नका, दोन भूमिका घेतल्या असल्या तरी अर्थ एकच आहे असे दैनिक 'सामना'ने आपल्या अग्रलेखातून म्हटले आहे. शिवसेना प्रमुखांनीही वारंवार गुणवत्तेचा आग्रह धरल्याची आठवण 'सामना'च्या अग्रलेखातून करून देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवरायांनी कष्ट आणि शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते  हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे, असे मत शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.  


संभाजीराजे यांची ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका 


मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे हे छत्रपती यांच्या गादींचे वारसदार आहेत आणि ते मराठा आरक्षणाच्या लढ्यात  आघाडीवर आहेत. 


या दोन भूमिकांमुळे सातारा आणि कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे, असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे, असे शिवसेनेने सांगितले आहे.


भाजपला शिवसेनेचा चिमटा


 भाजप नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदी यांचे मन वळवायला हवे. सध्या मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही,  असे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले आहे.


 मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.


पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी?


दरम्यान, मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत आणि फडणवीस यांचे सरकार राज्यात असताना पवार मराठा मोर्चात सामील झाले होते. १० ऑक्टोबरला सर्व संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. येथे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असतानाच धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचे धनगर समाजाच्या नेत्यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे यांचे ‘सगळ्यांचे आरक्षण रद्द करा व गुणवत्ता, आर्थिक निकष हाच निवडीचा आधार ठेवा’ असे सांगणे हे क्रांतिकारक आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.