मुंबई : सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि निम्मे मंत्रिपदं शिवसेनेला देण्यात यावी, असा फॉर्म्युला लोकसभेपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ठरलेला असल्याचं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील बैठकीत सांगितलं आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे ठरलेल्या फॉर्म्युल्यावर भाजपा अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता भाजपा काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आमदारांच्या या बैठकीत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली. आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करावं असा सूर विजयी आमदारांमध्ये उमटला. 'साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री', अशी साद विजयी उमदेवारांनी आदित्य ठाकरेंना घातली. 


दुसरीकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेनं विजयी बंडखोर आणि अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना बंडखोर आमदार आशिष जयस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघातील बंडखोर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे.