मुंबई : आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. 'सामना'ची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतांकडे सोपवण्यात आलीय. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपर्यंत 'सामना'च्या मजकूराची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर होती. आज मात्र सामनाच्या वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार ही जबाबदारी आता संजय राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनाप्रणीत महाविकासआघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे. त्यामुळे 'सामना'ने महाराष्ट्र धर्माचे सरकार असे या सरकारचे वर्णन केले. पण त्याचवेळी भाजपलाही जोरदार टोले दिलेत. 


शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकासआघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच असंख्य शिवसैनिकांसाठी शिवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी सायंकाळी हा शपथविधी सोहळा होत आहे.


शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे विविध मान्यवरांची, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती पाहायला मिळेल. खुद्द ठाकरे कुटुंबीयांनी या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने निमंत्रणासाठी पुढे सरसावत आप्तजनांना अगत्याने बोलावले असल्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्यांकडेही अनेकांचं लक्ष असेल. गुरुवारी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रविकासआघाडीला ३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.