मुंबई : दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीचं वातावरण होतं. पण आता हळूहळू तापमानवाढीला सुरूवात झाली आहे. शनिवारपासून राज्यात तापमानात वाढण्यास सुरूवात होईल. मुंबईकरांनी शुक्रवारी सकाळी अधिक गारठा अनुभवला. सांताक्रूझ येथे किमान तामपान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होते. सांताक्रूझ येथे १७.४ नोंदवले गेले, तर कुलाबा येथे किमान तापमान १९ अंश होते. तापमानबदलामुळे राज्यभरात नागरिकांमध्ये सर्दी-खोकल्याच्या त्रासाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या किमान तापमानात झालेली ही घसरण नागरिकांना शनिवारी अनुभवायला मिळू शकेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी पनवेलच्या तापमानात १४.९ अंशांपर्यंत घसरण झाली होत. तर बोरिवली पूर्व १५.५ आणि गोरेगाव येथे १६.८ असे किमान तापमान नोंदवले गेले. त्यामुळे मुंबई उपनगरांमध्ये अचानक गारठा जाणवला. 


तापमानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे रविवार आणि सोमवारी मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. सतत होणाऱ्या वातावरणाच्या चढ-उतारामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी


नाशिकमध्ये देखील वातावरणात बदल जाणवत आहेत. निफाडचा पारा अचानक घसरला आहे. याठिकाणी ७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात नोंद करण्यात आली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घसरण झाली आहे.