मुंबई : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. दोन आठवडे अधिवेशन चालणार असलं तरी शासकीय सुट्ट्यांमुळे प्रत्यक्षात ९ दिवसच कामकाज होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र गुरुनानक जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी ही कामकाज चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केवळ ९ दिवस कामकाज चालण्यावरून विरोधी पक्षानं अधिवेशन कालावधी ३ आठवडे करण्याची मागणी केली आहे. त्यावर गरज लागली तर शनिवारीही कामकाज घेऊ आणि अधिवेशन दरम्यान कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत वेळ वाढवण्याबाबत चर्चा करु असं देखील सरकारने म्हटलं आहे. 


विरोधकांनी गोंधळ न घालता कामकाजात सहभागी होण्याचं आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आलं आहे. याआधी नागपुरात झालेलं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं होतं. पावसाचं पाणी अधिवेशनाच्या आवारात घुसल्याने अधिवेशनावर याचा मोठा परिणाम झाला होता. यावेळी सरकारवर टीका देखील झाली होती. 


दुष्काळ, शेतकरी कर्जमाफी यावरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. पावसाळी अधिवेशनात नाणारच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्याने फारसे कामकाज होऊ शकले नव्हते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पावसात, दुसरा आठवडा गोंधळात, तर तिसरा आठवडा कसाबसा कामकाजात गेला होता. परंतू आता हिवाळी अधिवेशनात खरचं किती कामकाज होतं हे पाहावं लागेल.