बेंगळुरू :  बेंगळुरुतील भाजपच्या नेत्याची अज्ञात टोळीने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.  श्रीनिवास प्रसाद उर्फ कित्तगनहल्ली वासू (वय ३८) असे या नेत्याचे नाव असून बोमसुंद्रा येथील बीटीएल महाविद्यालयाजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अनेकल तालुक्यातील कित्तगनहल्ली गावचे ते रहिवासी होते.
 
श्रीनिवास प्रसाद हे बोमसंद्रा नगरपरिषदेचे भाजपचे सदस्य असून, दलित समाजाचे नेते म्हणून ओळखले जात होते. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते इनोव्हा कारमधून जात होते. बोमसंद्रा येथील बीटीएल महाविद्यालयाजवळ अज्ञातांनी त्यांची कार अडवली. त्यांना बाहेर खेचले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
 
हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे, असे बेंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी सांगितले.


राजकीय वैमनस्य आणि व्यापारी संबंधांतून त्यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. वासू हे रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत होते. राजकीय क्षेत्रातही त्यांचे चांगले नाव झाले होते. त्यामुळे या बाजुनेही या हत्येच्या घटनेचा तपास करण्यात येत आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.