उडिसा : ओडिसामध्ये एका गरीब कुटुंबातील मुलींना आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी चक्क घराचे लाकडाचे छत काढावे लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशातील गोलामुंडा जिल्ह्यातील डोकरीपाडा गावातून ही घटना समोर आली आहे. एका गरीब कुटुंबातील 75 वर्षे वयाच्या एका महिलेचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या महिलेला चार मुली होत्या. मृत्यूनंतरही दारिद्र्य पाठ सोडत नसल्याचं आणखी एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.


आई जाण्याचे दु:ख बाजूला ठेवून या मुलींनी आईच्या अंत्यविधीसाठी शेजाऱ्यांकडे मदत मागितली पण मदतीसाठई कोणीच आलं नाही. अनेक तास आईचा मृतदेह पलंगवर पडून होता. कोणीही मदतीला नाही आलं. शेवटी मुलींनी घराच्या लाकडाचे छत काढून आईवर अंत्यसंस्कार केले. चार मुलींपैकी दोन मुली विधवा आहेत. तर दोन मुलींना त्यांच्या पतींनी सोडून दिले आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याचे त्या भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या.