मुंबई : फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललिता या नावातच जय असलेल्या जयललितांनी अनेक ठिकाणी विजय मिळवला खरा, मात्र हा प्रवास म्हणावा तितका सोपा नक्कीच नव्हता. 24 फेब्रुवारी 1948 रोजी कर्नाटकातील ब्राम्हण परिवारात जयललितांचा जन्म झाला. मात्र वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.


तमिळ इंडस्ट्रीत संध्या नावाने परिचीत असलेल्या जयललितांच्या आईलाही आपल्या मुलीने अभिनयाच्या क्षेत्रात यावं असं वाटायचं. झालंही तसंच. शाळेत असतानाच जयललितांना एपिसल नावाच्या एका इंग्रजी चित्रपटात काम करायची संधी मिळाली. सुंदर आणि तितकाच निरागस चेहरा, इंग्रजीवरील हुकुमत यामुळे जयललितांचा पडद्यावरील एपिरन्स भाव खाऊन गेला. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर्स शिवाजी गणेशन यांनी जयललितांचा पडद्यावरचा एपियरन्स पाहिला आणि त्यांनी नव्या फिल्मची ऑफर दिली.


वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षीच जयललितांना कन्नड फिल्ममध्ये मुख्य भूमिका करण्याची ऑफर  मिळाली आणि इथेच एका फिल्मी सफरची सुरूवात झाली. 1964-65 चा तो काळ, जेव्हा जयललितांनी स्कर्ट घालून फिल्मी पडद्यावर बिंनधास्तपणे एन्ट्री केली ज्याची अऩेकवर्ष चर्चा रंगत होती. अर्थातच जयललिता पहिल्या फिल्मस्टार होत्या ज्यांनी हे धाडस दाखवलं होतं. इंग्लिश फिल्मपासून सुरू झालेला हा फिल्मी प्रवास पुढे तमीळ, तेलुगू, कन्नड चित्रपटांपर्यंत पोचला. जयललिता यांनी सुमारे तीनशेहून अधिक फिल्म्स केल्या. इज्जत या एकमेव हिंदी फिल्ममधून जयललिता ही मॅन धर्मेंदसोबत बॉलिवूडच्या पडद्यावर झळकल्या. शिवाजी गणेशन आणि एमजी रामचंद्रन यांच्यासोबतच जयललितांनी अधिकाधिक चित्रपट केले. 


एमजीआर आणि जयललिता ही जोडी साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सर्वाधिक सुपरहिट जोडी ठरली होती. कालांतराने एमजीआर तमीळनाडूच्या राजकारणात आले आणि मुख्यमंत्रीही झाले. एमजीआर हेच आपले आयडॉल असल्याचं जयललिता आवर्जून सांगत. पुढे जयललितांनी फिल्मी पडद्यावरची आपली इनिंग थांबवली. आणि एमजीआरसोबत राजकीय पटलावर नवी इनिंग सुरू केली.  एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचाच वारसा पुढे चालवत जयललिता यांनी राजकीय पटलावर हुकुमत गाजवली आणि मुख्यमंत्रीपदावर एकदा नव्हे दोनदा नव्हे तर पाचवेळा विराजमान होण्याचा विक्रमही केला.


मुख्यमंत्रीपदी असतानाही जयललितांचा शाही थाटमाट हाही नेहमीच चर्चेचा विषय ठरला. महागड्या साड्या, अलंकार आणि वैयक्तिक कार्यक्रमांतील अवाढव्य खर्च हे विषय नेहमीच गाजले. मात्र त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेप्रती असलेली जागरुकता, सर्वसामान्यांसाठी तारणहार, गरिबांना वेळोवेळी आधार देणारी ही अम्मा तमिळनाडूच्या जनतेसाठी अक्षरशः शब्दशः गळ्यातील ताईत होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये.