रांची : झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. तर आणखी 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणा-या भोडाय इथं गुरुवारी ही घटना घडलीय. दुर्घटना ज्या ठिकाणी घडली ती खाण ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडची आहे. या दुर्घटनेत कामगारांसह मशिन्सही अडकून पडल्यात. ही दुर्घटना घडली त्यावेळी सीआयएसएफची एक तुकडीही घटनास्थळी होती. मात्र या तुकडीतील सर्वजण सुरक्षित आहेत. 


मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून सीआयएसएफचे दोन अधिकारी आणि२१ कॉन्स्टेबलना घटनास्थळी पाठवण्यात आलंय. सध्या दोन जणांना वाचवण्यात यश आलंय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


जमीन खचल्याने जवळ असणारे विजेचे खांब कोसळल्याने परिसरात अंधार झाला होता. ज्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मुख्यमंत्री रघुबर दास हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी या संदर्भात अधिका-यांकडून माहिती घेतलीय.