हैदराबाद : अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरून नेण्याची वेळ पतीवर आली आहे. तेलंगणामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रामुलु हे त्यांच्या पत्नीचा मृतदेह 24 तासांपर्यंत 60 किलोमिटर नेऊन रस्ता चुकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामुलुंची पत्नी कविता या अनेक आजारांनी त्रस्त होत्या. यामुळे शुक्रवारी त्यांचं हैदराबाद रेल्वे स्टेशनजवळ निधन झालं. रामुलुंना कवितांचं पार्थिव गावाला न्यायचं होतं, पण अॅम्ब्यूलन्ससाठी पाच हजार रुपयांचा खर्च येईल, असं त्यांना सांगण्यात आलं.


खिशामध्ये एक हजार रुपयेही नसल्यामुळे अखेर रामुलुंनी कवितांचं पार्थिव ढकलगाडीवर ठेवलं आणि ते गावाला जायला निघाले, पण विक्रमगडपर्यंत गेल्यावर रामुलु रस्ता चुकले, यानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीनं त्यांनी तिकडेच पत्नीवर अंत्यसंस्कार केले.


तीन महिन्यांआधीच ओडिसामधल्या दाना माझी यांना त्यांच्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जावा लागला होता. माझी यांना सरकारी रुग्णालयानं अॅम्ब्यूलन्स देणं नाकारलं होतं. आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे.