मुंबई : केंद्र सरकार एटीएम मशीनमध्ये रक्कम भरणाऱ्या अधिकृत कंपन्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. या अटी लागू झाल्यास बँकांच्या एटीएममध्ये रात्री ८ वाजल्यानंतर काही कंपन्यांना पैसै भरता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार आणत असलेल्या नव्या नियमावलीनुसार एटीएम मशीन्समध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांना सकाळीच संबंधित बँकांकडून रक्कम जमा करुन ती एटीएम मशीनमध्ये भरावी लागणार आहे. या अटी लागू झाल्यानंतर समजा तुमच्या घराजवळील एटीएममधील रक्कम रात्रीपर्यंत संपले, तर तुम्हाला पैसे काढणे शक्य होणार नाही.


तसेच सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा लावलेल्या गाड्यांनी पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगण्यावरही या नियमावलीनुसार बंदी येणार आहे. गाडीवर दरोडा पडल्यास अशा स्थितीत या दरोडेखोरांचा सामना करण्यासाठी दोन सशस्त्र सुरक्षारक्षकही या गाड्यांमध्ये असणे बंधनकारक होईल. या व्यक्तींना नोकरीवर ठेवताना दोन हमीदार व्यक्ती असाव्या लागतील, ज्यातील किमान एक व्यक्ती सरकारी कर्मचारी असणे आवश्यक असणार आहे.


देशभरात दिवसाला एटीएम मशीनमध्ये रक्कम भरणाऱ्या जवळपास ८ हजार गाड्या दर दिवशी कार्यरत आहेत ज्या १५ हजार कोटींच्या रकमेचे दिवसाला परिवहन करतात. या गाड्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळेच सरकारने हे नवे नियम आणण्याचा विचार केला आहे.


देशातील शहरी भागात ही मर्यादा रात्री ८ इतकी असेल, तर ग्रामीण भागात ती सायंकाळी ५ इतकी असेल. तर नक्षलग्रस्त भागात ही मर्यादा दुपारी ३ इतकी करण्यात आली आहे. पण, या नवीन नियमांमुळे जर कोणाला अडचणीच्या वेळी पैशांची गरज भासली तर काय करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.