चेन्नई : अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन आज बंगळूरूमध्ये शरण येण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांनी शरणगतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं शरण येण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकला नटराजन यांना ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं 4 वर्षांची शिक्षा सुनावली. तसंच 100 कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय. शशिकलांसह अन्य दोन आरोपींना सुप्रीम कोर्टानं दोषी मानलंय. 


काल संध्याकाळी उशिरा  शशिकला यांनी चेन्नई जवळच्या कोव्वट्टूरमधील गोल्डन बे रिसॉर्टमधून पोस गार्डन या निवासस्थानी गेल्या. आज सकाळी शशिकला बंगळुरूत शरणागती पत्करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


दरम्यान काल शशिकलांनी अण्णा द्रमुकच्या विधानसभा नेतेपदी पलानीस्वामी यांची नियुक्ती केली. त्यानंतर पलानीस्वामींनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला.  तिकडे संध्याकाळी पन्नीर सेल्वम यांनीही राज्यपालांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याची विनंती केली. 


शिवाय विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास तयार असल्याचं दोन्ही गटांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता राज्यपाल विधानसभेचं अधिवशेन कधी बोलावतात आणि तामिळनाडूच्या विधानसभेत कोणता गट बहुमत सिद्ध करतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.