नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत काश्मीर हिंसाचारावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. काश्मीरी ही आमची जनता आहे. त्यामुळे तिथं जनमत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी खडसावलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर खोऱ्यातल्या हिंसाचारामागे पाकिस्तानचाच हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. नाव पाकिस्तान आहे, पण कृती नापाक आहे, अशा शब्दांत सिंह यांनी तोफ डागली... त्याच वेळी दहशवाद्यांचा सामना बंदुकीनं केला पाहिजे, पण हिंस्त्र जमावाला काबूत आणण्यासाठी प्रथमच पाण्याचे फवारे, अश्रूधूर याचा वापर केला पाहिजे, असंही गृहमंत्री म्हणाले. 


काश्मीर खोऱ्यातली स्थिती अद्याप तणावपूर्ण आहे. दररोज दगडफेकीच्या घटना घडतायत. आज काश्मीर खोरं बहुतांश शांत असलं तरी कुपवाडा, सोपोर, राफियाबाद इथं हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. सत्ताधारी PDPचे आमदार मोहम्मद खलिल बंद जखमी झालेत. पुलवामा इथं त्यांच्या वाहनावर काल रात्री उशिरा जमावानं हल्ला चढवला होता. याखेरीज आज दिवसभरात 5 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. सलग 10व्या दिवशी काश्मीर खोऱ्यातली संचारबंदी कायम आहे. तसंच मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आलीये. आज सलग तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रंही खोऱ्यातल्या स्टँडवर पोहोचू शकलेली नाहीत.