तमिळनाडू : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय. मुख्यमंत्री जयललितांनी प्रचारात आघाडी घेतलीये. टप्प्या-टप्प्यानं संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचं जयललितांनी आश्वासन दिलंय. करुणानिधींच्या काळात दारूविक्री वाढल्याचा आरोप मुख्यमंत्री जयललीता यांनी केलाय. चेन्नईतील एआयएडीएमके पक्षाच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.


राज्यात दारुबंदीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी आपल्या भाषणात दिलं. यापूर्वीच्या करुणानिधी सरकारनं दारुबंदीचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांच्या काळातचं दारु विक्री वाढली, असा टोला जयललिता यांनी लगावला. एआयएडीएमके पक्षानं अत्याधुनिक अशा ७५ प्रचार व्हॅन तयार केल्यात. सरकारनं राबवलेल्या अभिनव योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवली जातेय.  या निवडणुकीत करुणानिधी यांचा डिएमके पक्ष आणि काँग्रेस यांची युती झालीये.