नवी दिल्ली : भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान काही शांत बसतांना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी सेना १०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसीमध्ये लॉंचिंग पॅड्सवर पुन्हा एकदा अनेक दहशतवादी एकत्र आल्याची माहिती बीएसएफकडून मिळत आहे. पाकिस्तानी सेना सीमेवर गोळीबार करुन जवानांचं लक्ष विचलित करुन दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत आहे.


भारतीय जवानांच्या कॅम्पवर गोळीबार केला जातोय. मंगळवारी देखील अनेकदा पाकिस्तानने लष्कराच्या पोस्टवर गोळीबार केला. बीएसएफ आणि भारतीय सेना एकत्रपणे सीमेचं रक्षण करत आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिक जोरदार प्रत्यूत्तर देत आहेत. पाकिस्तानकडून मानवरहित विमाने देखील सीमेवर पाठवली जात आहे. भारताच्या जवानांवर पाकिस्तान लक्ष ठेवून आहे. दहशतवाद्यांना भारतीय लष्करावर हल्ला करण्यासाठी आणि घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानच्या सेनेकडून मदत होत आहे.