मुंबई : गेल्या आठवड्यात एका भारतीय ख्रिस्ती धर्मगुरुंना आयसिस या दहशतवादी संघटनेने गुड फ्रायडेच्या दिवशी सुळावर लटकवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता हे धर्मगुरू जिवंत असून लवकरच त्यांची सुटका होणार असल्याचे ख्रिस्ती गटाने म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीचा आधार दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फादर टॉम उझ्झूनल्लील या मूळच्या दक्षिण भारतीय धर्मगुरुंचे ४ मार्चला येमेनमधील एका वृद्धाश्रमातून अपहरण करण्यात आले होते. यानंतर बंगळुरूमधील ख्रिस्ती लोकांच्या एका संघटनेने केलेल्या दाव्यानुसार या फादरना गुड फ्रायडेच्या दिवशीच सुळावर चढवण्याचा घाट आयसिसने घातला होता. यानंतर या संघटनेचे काही पदाधिकारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना भेटले. 


'स्वराज यांनी आम्हाला फादर सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. ते लवकरच सुटतील अशी शक्यता आहे,' असं द कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाचे उपसचिव फादर जोसेफ चिन्नईयान यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या खोट्या होत्या असेही चिन्नईयान म्हणाले आहेत. 


या बातम्या आल्यावर काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी 'हे फादर ख्रिस्ती असल्याने केंद्र सरकारने त्यांच्या सुटकेचा प्रयत्न केला नाही,' असा आरोपही केला होता. ज्यामुळे वाद उत्पन्न झाला होता.